आपला भारतीय समाज हा अनेक जाती, धर्म, पंथ यात विभागलेला आहे. तो एकसंघ नाही. ही भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या मार्गातील अडचण आहे. त्या करिता जाति-निर्मूलनाची चळवळ आवश्यक आहे, असे आम्ही मानतो. आपल्याकडे विवाह जातीमध्ये बंदिस्त असलेला, जातीचा, धर्माचा प्रभाव असलेला संस्कार आहे. या परंपरेमध्ये हुंडा, पत्रिका असले कर्मकांडं सुद्धा आहेत. याचे ताजे उदाहरण म्हणजे जून महिन्यात मुंबईत कांदिवली येथे राहणा-या तिन बहिणींना लग्न रखडल्याने नैराश्य येउन आत्महत्या केली. ही घटना म्हणजे आपल्या धर्म, जाती व्यवस्थेचा व परंपरेचा पराजय आहे. म्हणून जात-धर्म, यांचा प्रभाव किमान लग्नापुरता नाहीसा करण्याचा प्रयत्न करणे हीच आमची भूमिका आहे.
संस्थेची सुरूवात : १९८१ या वर्षी पुणे येथे “जाती-निर्मूलन संस्थेचे” संस्थापक शिरुभाऊ लिमये यांनी ” आंतरजातीय विवाह आणि सामाजिक परिवर्तन” या विषयावर उहापोह करण्यासाठी तरूण कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. त्यातून “समाज-परिवर्तनासाठी आंतरजातीय विवाह” ही पुस्तिका प्रकाशित झाली. त्या पुस्तिकेवरून प्रदर्शन निर्माण केले गेले. ते प्रदर्शन पाहण्याचा योग आला. मी निवृत्त झाल्यावर काय करावे हेही तिथेच ठरले. प्रथम त्या प्रदर्शनाची प्रतिकृती मी बनवून घेतली. पुस्तिकेची विक्री, प्रदर्शन, व विवाहेच्छूचे मेळावे असे कार्यक्रम ठिकठिकाणी घेतले, ते “सुगावा मिश्र विवाह मंडळा”च्या छत्राखाली. पुण्यातही अशी संस्था चालविणारे प्रा. विलास वाघ, व उषा वाघ यांनी ही मला मार्गदर्शन केले व कामाला म्हणजे विवाहेच्छूंची नोंदणी करायला सुरूवात केली व मला पूर्ण वेळ काम मिळाले.
नियम, अटी, बंधने : हुंडा देणार नाही -घेणार नाही, पत्रिका पाहणार नाही, जात विचारात आणणार नाही या आमच्या प्रमुख अटी आहेत. आम्ही एकदाच नोंदणी करताना रू. ५० घेतो, लग्न जमल्या वर काहीही घेत नाही.
कामाची पद्धत : आम्ही विवाहेच्छूंची नोंदणी करतो, संस्थेच्या फ़ॊर्म वर त्यांचा पूर्ण तपशील नोंदवून ….. विवाहेच्छू तरूण तरूणींना बोलावून त्यांच्या अपेक्षा, जाणिवा यांची माहिती करून घेतली जाते, परिचय मेळावे आयोजित केले जातात, मान्यवरांना बोलावून त्यांच्याशी चर्चा घडवून आणली जाते, यांतूनच आंतरजातीय विवाह आणि तत्सम जबाबदारीची जाणिव त्यांना होते.
कामामागील हेतू : या मागचा आमचा आणखी एक हेतू म्हणजे केवळ आंतरजातीय विवाह करण्याची इच्छा असणे, इतकेच पुरेसे नाही. अशा विवाहाने एकत्र येणा-या दांपत्यांना एकमेकांच्या आवडी-निवडी, खाण्या-पिण्याच्या सवयी, अन्य सवयी व संस्कार आदीमध्ये भिन्नता असते. त्यासाठी एकमेकांना समजून घेणे आणि समजावून देणे महत्त्वाचे असते त्यादृष्टीने त्यांना मार्गदर्शन केले जाते, किंबहुना या सर्व माहितीच्या आधारावर लग्न जुळविणा-या आमचा प्रयत्न असतो. शिवाय मेळावे, प्रदर्शन, निबंध स्पर्धा याद्वारे आमचे प्रबोधनाचे काम चालू असते.
बंधने : लग्न जमल्यावर आम्ही ते नोंदणी पद्धतीने व्हावे असा आमचा प्रयत्न असतो. तसेच खर्चिक उधळपट्टी टाळावी. समारंभ फार मोठा न करता घरगुती पातळीवर करावे असे समजावतो. परंतु टोकाचा आग्रह धरीत नाही. कारण हुंड्याची अनिष्ट प्रथा मोडून पत्रिका न पाहता आंतरजातीय विवाह होतोय हेच आमच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. आम्ही अशा वेळी सुद्धा आग्रही भूमिका घेतली तर अशा व्यक्ती समाजापासून तुटण्याचा ्धोका असतो. असे सामाजिक बदल करताना एकाकी पडून चालणार नाही.
विवाहितांना मदत : प्रेमाने असो किंवा ध्येयाने, आंतरजातीय विवाह जुळला असेल अशा सुरूवातीच्या काळात पालक काही वेळा कडवटपणे वागतात. अशा काळात त्यांना आधार देणे, त्यांच्याबरोबर राहाणे महत्त्वाचे असते. संस्थेतून विवाह झालेले व संस्थेचे कार्यकर्ते व त्यांचे कुटुंबिय अशावेळी त्यांची सोबत करतात. शिवाय आंतरजातीय विवाह आमच्याकडून झालेले असो वा नसो अशा विवाहांचे आम्ही जाहीर अभिनंदन करतो व त्यांच्या अभिनंदनाची पत्रे समाजातील काही मान्यवरांना व सामाजिक कार्यकर्त्यांना पाठवितो व त्यांना अशा विवाहितांचे अभिनंदन करायला सांगतो. त्यामुळे विवाहितांना एकाकी वाटत नाही तर संपूर्ण समाज आपल्या बाजूने आहे, असे त्यांना जाणवते.
सभासदांची नोंदणी : आमच्याकडे १. आंतरजातीय विवाहाचे महत्त्व पटलेली २. मागच्या पिढीत आंतरजातीय विवाह केलेल्यांची मुले ३. समाजाच्या प्रथेप्रमाणे हुंडा, मानपान खर्च न झेपणारी ४. वयामुळे लग्न न जमणारी ५. घटस्फोटीत ६. विधवा-विधूर आदी विविध प्रकारच्या व्यक्ती आमचेकडे येतात. केवळ परिस्थितीमुळे आंतरजातीय विवाह करणा-यांचा आग्रह शक्यतो वरच्या जातींचा असतो. आपल्यापेक्षा उच्च जात ब-याच जणांना हवी असते. आम्ही जातीपेक्षा व्यक्तीचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करतो. दलित-सुवर्ण, हिंदू-मुस्लिम, मुसलमान-ख्रिश्चन असे विवाह कमी होतात, तसे व्हावेत असा आमचा प्रयत्न असतो. यापूर्वी चांभार-वैश्य वाणी, खाटीक-ओबीसी, रजपूत-मुसलमान, मुसलमान-मराठा असे विवाह आम्ही जुळविले आहेत. शिवाय एकाच कुटुंबातील भावंडाचीही आंतरजातीय विवाह जमविले गेले आहेत, शिवाय नासिक-मुंबई, मुंबई-पुणे, मुंबई-इंदोर असे विवाह आम्ही जमविले आहेत.
आतापर्यंत विवाह झालेल्यांचे अनुभव : गेल्या दहा वर्षात चाळीस विवाह आमच्या मंडळाने जमविले. ते सर्व सफल झाले आहेत. त्या सर्वांशी संस्थेचे आजही जवळचे संबंध आहेत. या सर्वांचा एकमेकांशी परिचय व्हावा म्हणून मंडळाच्या दहाव्या वर्धापनदिना निमित्ताने एकत्र आली. त्यांच्यातील काही दांपत्यांनी “सुगावा परिवार”ची निर्मिती केली. अनेक आंतरजातीय व आंतर-धर्मीय विवाहीत दांपत्ये ह्या सुगावा परिवाराचे सभासद आहेत.
केवळ विवाह जमविल्यावर आमचे काम संपले असे आम्ही मानत नाही. त्यांच्या लग्नानंतर आमची जबाबदारी वाढते. पती-पत्नी मध्ये बेबनाव होऊ नये, त्यांची संबध सुरळीत असावेत हे आम्ही महत्त्वाचे मानतो. अशी लग्ने म्हणजे सामाजिक आव्हांन असते, ते सफल व्हावे यासाठी सततच्या संपर्कातून काळजी घेतो.
कुटुंबाचा सहभाग आणि सहकारी : माझ्या सर्व मुलांची आंतरजातीय विवाह झाले आहेत. पैकी दोन लग्ने सुगावामार्फत जमली आहेत. माझ्या कुटुंबातील सर्वांनीच मला नेहमीच सहकार्य केले आहे. तसेच सुरूवातीपासून डॊ. सुधा कावतकर, हेमंत नि-हाळी यांची मदत नेहमीच झाली. अलिकडे पुष्पा नागोरी, प्रफुल्लता दळवी, जीवराज सावंत, उन्मेष बागवे, त्यांची पत्नी जुई यांचेही सहकार्य मिळत आहे.
सामाजिक जाणीवा जागृत करण्यासाठी आंतरजातीय विवाह हे आमचे ध्येय आहे. मला सहकार्य करणारे सर्व तरूण-तरूणींनी स्वतः आंतरजातीय / आंतर-धर्मीय विवाह केले आहेत. धन्यवाद …..
( हा लेख आप्पा रेडीज यांच्या आकाशवाणी वरील मुलाखतीवर , १० नोव्हेंबर १९९८ , आधारीत आहे )



January 15th, 2000
admin 