सुगावा मिश्र विवाह मंडळाची भूमिका

आपला भारतीय समाज हा अनेक जाती, धर्म, पंथ यात विभागलेला आहे. तो एकसंघ नाही. ही भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या मार्गातील अडचण आहे. त्या करिता जाति-निर्मूलनाची चळवळ आवश्यक आहे, असे आम्ही मानतो. आपल्याकडे विवाह जातीमध्ये बंदिस्त असलेला, जातीचा, धर्माचा प्रभाव असलेला संस्कार आहे. या परंपरेमध्ये हुंडा, पत्रिका असले कर्मकांडं सुद्धा आहेत. याचे ताजे उदाहरण म्हणजे जून महिन्यात मुंबईत कांदिवली येथे राहणा-या तिन बहिणींना लग्न रखडल्याने नैराश्य येउन आत्महत्या केली. ही घटना म्हणजे आपल्या धर्म, जाती व्यवस्थेचा व परंपरेचा पराजय आहे. म्हणून जात-धर्म, यांचा प्रभाव किमान लग्नापुरता नाहीसा करण्याचा प्रयत्न करणे हीच आमची भूमिका आहे.

संस्थेची सुरूवात :  १९८१ या वर्षी पुणे येथे “जाती-निर्मूलन संस्थेचे” संस्थापक शिरुभाऊ लिमये यांनी ” आंतरजातीय विवाह आणि सामाजिक परिवर्तन” या विषयावर उहापोह करण्यासाठी तरूण कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. त्यातून “समाज-परिवर्तनासाठी आंतरजातीय विवाह” ही पुस्तिका प्रकाशित झाली. त्या पुस्तिकेवरून प्रदर्शन निर्माण केले गेले. ते प्रदर्शन पाहण्याचा योग आला. मी निवृत्त झाल्यावर काय करावे हेही तिथेच ठरले. प्रथम त्या प्रदर्शनाची प्रतिकृती मी बनवून घेतली. पुस्तिकेची विक्री, प्रदर्शन, व विवाहेच्छूचे मेळावे असे कार्यक्रम ठिकठिकाणी घेतले, ते “सुगावा मिश्र विवाह मंडळा”च्या छत्राखाली. पुण्यातही अशी संस्था चालविणारे प्रा. विलास वाघ, व उषा वाघ यांनी ही मला मार्गदर्शन केले व कामाला म्हणजे विवाहेच्छूंची नोंदणी करायला सुरूवात केली व मला पूर्ण वेळ काम मिळाले.

नियम, अटी, बंधने : हुंडा देणार नाही -घेणार नाही, पत्रिका पाहणार नाही, जात विचारात आणणार नाही या आमच्या प्रमुख अटी आहेत. आम्ही एकदाच नोंदणी करताना रू. ५० घेतो, लग्न जमल्या वर काहीही घेत नाही.

कामाची पद्धत : आम्ही विवाहेच्छूंची नोंदणी करतो, संस्थेच्या फ़ॊर्म वर त्यांचा पूर्ण तपशील नोंदवून ….. विवाहेच्छू तरूण तरूणींना बोलावून त्यांच्या अपेक्षा, जाणिवा यांची माहिती करून घेतली जाते, परिचय मेळावे आयोजित केले जातात, मान्यवरांना बोलावून त्यांच्याशी चर्चा घडवून आणली जाते, यांतूनच आंतरजातीय विवाह आणि तत्सम जबाबदारीची जाणिव त्यांना होते.

कामामागील हेतू : या मागचा आमचा आणखी एक हेतू म्हणजे केवळ आंतरजातीय विवाह करण्याची इच्छा असणे, इतकेच पुरेसे नाही. अशा विवाहाने एकत्र येणा-या दांपत्यांना एकमेकांच्या आवडी-निवडी, खाण्या-पिण्याच्या सवयी, अन्य सवयी व संस्कार आदीमध्ये भिन्नता असते. त्यासाठी एकमेकांना समजून घेणे आणि समजावून देणे महत्त्वाचे असते त्यादृष्टीने त्यांना मार्गदर्शन केले जाते, किंबहुना या सर्व माहितीच्या आधारावर लग्न जुळविणा-या आमचा प्रयत्न असतो. शिवाय मेळावे, प्रदर्शन, निबंध स्पर्धा याद्वारे आमचे प्रबोधनाचे काम चालू असते.

बंधने : लग्न जमल्यावर आम्ही ते नोंदणी पद्धतीने व्हावे असा आमचा प्रयत्न असतो. तसेच खर्चिक उधळपट्टी टाळावी. समारंभ फार मोठा न करता घरगुती पातळीवर करावे असे समजावतो. परंतु टोकाचा आग्रह धरीत नाही. कारण हुंड्याची अनिष्ट प्रथा मोडून पत्रिका न पाहता आंतरजातीय विवाह होतोय हेच आमच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. आम्ही अशा वेळी सुद्धा आग्रही भूमिका घेतली तर अशा व्यक्ती समाजापासून तुटण्याचा ्धोका असतो. असे सामाजिक बदल करताना एकाकी पडून चालणार नाही.

विवाहितांना मदत : प्रेमाने असो किंवा ध्येयाने, आंतरजातीय विवाह जुळला असेल अशा सुरूवातीच्या काळात पालक काही वेळा कडवटपणे वागतात. अशा काळात त्यांना आधार देणे, त्यांच्याबरोबर राहाणे महत्त्वाचे असते. संस्थेतून विवाह झालेले व संस्थेचे कार्यकर्ते व त्यांचे कुटुंबिय अशावेळी त्यांची सोबत करतात. शिवाय आंतरजातीय विवाह आमच्याकडून झालेले असो वा नसो अशा विवाहांचे आम्ही जाहीर अभिनंदन करतो व त्यांच्या अभिनंदनाची पत्रे समाजातील काही मान्यवरांना व सामाजिक कार्यकर्त्यांना पाठवितो व त्यांना अशा विवाहितांचे अभिनंदन करायला सांगतो. त्यामुळे विवाहितांना एकाकी वाटत नाही तर संपूर्ण समाज आपल्या बाजूने आहे, असे त्यांना जाणवते.

सभासदांची नोंदणी : आमच्याकडे १. आंतरजातीय विवाहाचे महत्त्व पटलेली २. मागच्या पिढीत आंतरजातीय विवाह केलेल्यांची मुले ३. समाजाच्या प्रथेप्रमाणे हुंडा, मानपान खर्च न झेपणारी ४. वयामुळे लग्न न जमणारी ५. घटस्फोटीत ६. विधवा-विधूर आदी विविध प्रकारच्या व्यक्ती आमचेकडे येतात. केवळ परिस्थितीमुळे आंतरजातीय विवाह करणा-यांचा आग्रह शक्यतो वरच्या जातींचा असतो. आपल्यापेक्षा उच्च जात ब-याच जणांना हवी असते. आम्ही जातीपेक्षा व्यक्तीचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करतो. दलित-सुवर्ण, हिंदू-मुस्लिम, मुसलमान-ख्रिश्चन असे विवाह कमी होतात, तसे व्हावेत असा आमचा प्रयत्न असतो. यापूर्वी चांभार-वैश्य वाणी, खाटीक-ओबीसी, रजपूत-मुसलमान, मुसलमान-मराठा असे विवाह आम्ही जुळविले आहेत. शिवाय एकाच कुटुंबातील भावंडाचीही आंतरजातीय विवाह जमविले गेले आहेत, शिवाय नासिक-मुंबई, मुंबई-पुणे, मुंबई-इंदोर असे विवाह आम्ही जमविले आहेत.

आतापर्यंत विवाह झालेल्यांचे अनुभव : गेल्या दहा वर्षात चाळीस विवाह आमच्या मंडळाने जमविले. ते सर्व सफल झाले आहेत. त्या सर्वांशी संस्थेचे आजही जवळचे संबंध आहेत. या सर्वांचा एकमेकांशी परिचय व्हावा म्हणून मंडळाच्या दहाव्या वर्धापनदिना निमित्ताने एकत्र आली. त्यांच्यातील काही दांपत्यांनी “सुगावा परिवार”ची निर्मिती केली. अनेक आंतरजातीय व आंतर-धर्मीय विवाहीत दांपत्ये ह्या सुगावा परिवाराचे सभासद आहेत.

केवळ विवाह जमविल्यावर आमचे काम संपले असे आम्ही मानत नाही. त्यांच्या लग्नानंतर आमची जबाबदारी वाढते. पती-पत्नी मध्ये बेबनाव होऊ नये, त्यांची संबध सुरळीत असावेत हे आम्ही महत्त्वाचे मानतो. अशी लग्ने म्हणजे सामाजिक आव्हांन असते, ते सफल व्हावे यासाठी सततच्या संपर्कातून काळजी घेतो.

कुटुंबाचा सहभाग आणि सहकारी : माझ्या सर्व मुलांची आंतरजातीय विवाह झाले आहेत. पैकी दोन लग्ने सुगावामार्फत जमली आहेत. माझ्या कुटुंबातील सर्वांनीच मला नेहमीच सहकार्य केले आहे. तसेच सुरूवातीपासून डॊ. सुधा कावतकर, हेमंत नि-हाळी यांची मदत नेहमीच झाली. अलिकडे पुष्पा नागोरी, प्रफुल्लता दळवी, जीवराज सावंत, उन्मेष बागवे, त्यांची पत्नी जुई यांचेही सहकार्य मिळत आहे.

सामाजिक जाणीवा जागृत करण्यासाठी आंतरजातीय विवाह हे आमचे ध्येय आहे. मला सहकार्य करणारे सर्व तरूण-तरूणींनी स्वतः आंतरजातीय / आंतर-धर्मीय विवाह केले आहेत. धन्यवाद …..

( हा लेख आप्पा रेडीज यांच्या आकाशवाणी वरील मुलाखतीवर , १० नोव्हेंबर १९९८ , आधारीत आहे )

प्रसिद्धीसाठी कृपया खालील कळ दाबा
  • Facebook
  • Twitter
  • Google Bookmarks
  • Yahoo! Bookmarks
  • IndianPad
  • del.icio.us
  • Digg
  • MySpace
  • Technorati
  • LinkedIn
  • email
  • Print
  • PDF

लग्न जुळविण्यासाठी आधुनिक कुंडली

ही आहे आधुनिक कुंडली, शास्त्र-शुद्ध पायावर आधारलेली. सुगावा परिवार आणि प्रतिबिंब मिश्र विवाह मंडळासारख्या अनेक पुरोगामी संस्थानी लग्न जुळविताना या कुंडली चा पर्याय सर्वांसाठी उपलब्ध करून दिला आहे.

राहू, केतू, मंगळ या भ्रामक व अशास्त्रीय गोष्टींवर आधारीत पत्रिकेचा उपयोग केवळ लग्न न जुळविण्याचे कारण म्हणून केला जातो, त्याऍवजी आता या पत्रिकचा वापर करावा

आपलं काय मत आहे यावर ?

प्रसिद्धीसाठी कृपया खालील कळ दाबा
  • Facebook
  • Twitter
  • Google Bookmarks
  • Yahoo! Bookmarks
  • IndianPad
  • del.icio.us
  • Digg
  • MySpace
  • Technorati
  • LinkedIn
  • email
  • Print
  • PDF

साने गुरूजींविषयी पु.ल.

अमळनेरला साने गुरूजींच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करताना पु.लंनी केलेल्या उत्स्फूर्त सुंदर भाषणातला काही भाग.

आभार - दिपक

“ह्या जगामध्ये असुरांच्या सृष्टीत सुरांचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून ज्यांनी प्रयत्न केले त्यांत गुरुजींचे स्थान आधुनिक काळात तरी अनन्यसाधारण आहे. अजोड आहे. `ब्राह्मणही नाही, हिंदुही नाही, न मी एक पंथाचा! तेच पतित की, आखडिती जे प्रदेश साकल्याचा!’ केशवसुतांचा `नवा शिपाई’ मला साने गुरूजींमध्ये दिसला. साकल्याच्या प्रदेशातला हा फार थोर प्रवासी. जीवनाच्या किती निरनिराळ्या अंगांत ते रमले होते. साने गुरुजींच्या डोळ्यांत अश्रू येत असत. हो येत असत. मी तर म्हणतो की तसले अश्रू येण्याचे भाग्य एकदा जरी तुमच्या आयुष्यात लाभले तरी क्षण खर्‍या अर्थाने आपण जगलो असे म्हणा. साने गुरुजी नुसते रडले नाहीत. प्रचंड चिडले. ते रडणे आणि ते चिडणे सुंदर होते. त्या चिडण्यामागे भव्यता होती. गुरुजी केवळ साहित्यासाठी साहित्य किंवा कलेसाठी कला असे मानणार्‍यातले नव्हते. जे जे काही आहे ते जीवन अधिक सुंदर करण्यासाठी आहे, अशी त्यांची श्रद्धा होती आणि त्या श्रद्धेपोटी लागणारी किंमत गुरुजी देत होते. तुकारामांच्या शब्दांत बोलायचे म्हणजे-

तुका म्हणे व्हावी प्राणासवे आटी
नाही तरी गोष्टी बोलू नये

अशी गुरुजींची जीवननिष्ठा. त्यांनी स्वत:ला साहित्यिक म्हणवून घेण्याचा आग्रह धरला नाही हे खरं , पण ते खरोखरीच चांगले साहित्यिक होते. गुरुजींना साहित्यिक म्हणून मोठे मनाचे स्थान दिले पाहिजे. गुरुजींना निसर्गाने किती सुंदर दर्शन घडते. झाडू, टोपली घेऊन कचरा नाहीसा करणारे गुरुजी निसर्गात खूप रमत असत. सार्‍या कलांविषयी गुरुजींना ओढ होती. सेवा दलाच्या कला पथकाचे सारे श्रेय साने गुरुजींना. आमच्यासारखी मुले नाहीतर गाण्या-बजावण्याऎवजी त्यांच्या क्रांतिकार्यात कशी आली असती? गाण्यानं सारा देश पेटविता येतो. हे सारे ते एका महान धर्माचे पालन म्हणून करत होते. साने गुरुजींचा धर्म कोठला? मानवधर्म वगैरे आपण म्हणतो. साने गुरुजींचा धर्म म्हणजे मातृधर्म. मातृधर्माला त्याग्याचे मोल द्यावे लागते. गुरुजींनी आत्महत्या केली नाही. देश इतका नासला की, गुरुजींसारख्यांना जगणे आम्ही अशक्य करून ठेवले. आपल्या घरात गलिच्छ प्रकार सुरू झाले तर चांगली आई तिथे राहिल तरी का? जुन्या काळचे असेल तर ती बिचारी काशी यात्रेला जाईल. गुरुजी अशा एका महायात्रेला निघून गेले की, तिथून परत येणे नाही. त्यांच्या त्या अंताचा आपण असा अर्थ करून घायला हवा. गुरुजी गेले. गुरुजींना जावेसे वाटले. ते गेले त्यामुळे अनेक लोकांनी सुटकेचा निश्वासही सोडला असेल. कारण गुरुजींसारखी माणसं आपल्याला पेलत नाहीत. तो प्रेमाचा धाक त्रासदायक असतो. तो धर्म आचरायला म्हणजे त्रास असतो…”

पु.लंचा कंठ दाटुन आला होता. डोळ्यांत गुरुजींचेच अश्रू दाटुन आले होते. पु.लंनी स्वत:ला सावरलं. “शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी `ऊठवू सारे रान आता पेटवू सारे रान’ म्हणणारा, स्त्रियांची गाणी, लोकगीतं दारोदार, खेडोपाडी फिरून माताबहिणींमधली कविता सुखदु:ख वेचून घेणारा, त्यांच्या दु:खांना सामोरं जाणारा, दलितांसाठी मंदिरं आणि माणसांच्या अंत:करणातली बंद कवाडं खुली करायला सांगणारा हा महामानव या पवित्रभूमीत राहिला आणि काळ्याकुट्ट काळोखात बोलबोलता नाहिसा झाला.”

प्रसिद्धीसाठी कृपया खालील कळ दाबा
  • Facebook
  • Twitter
  • Google Bookmarks
  • Yahoo! Bookmarks
  • IndianPad
  • del.icio.us
  • Digg
  • MySpace
  • Technorati
  • LinkedIn
  • email
  • Print
  • PDF

आवाहन

आपण पालक असल्यास …

आपल्या मुलाला किंवा मुलीला जातीबाहेर लग्न ठरविण्यास प्रोत्साहन देऊ शकता. निदान तसे स्वातंत्र्य देऊ शकता.

आपल्या मुलाने किंवा मुलीने जातीबाहेर लग्न ठरविले तरी त्यांच्याशी संबंध न तोडता त्यांच्या सुखी संसाराला मदत करू शकता.

निदान मुलाचे किंवा मुलीचे लग्न ठरविताना केवळ जातीमध्येच स्थळ न पाहता इतर गोष्टी शास्त्रीय दृष्टीकोनातून विचारात घेऊ शकता.

सामाजिक एकोपा वाढवू शकता.

आपण विवाहेच्छूक तरूण / तरूणी असल्यास …

मी जातीबाहेर लग्न ठरवीन अशी प्रतिज्ञा घेऊन त्या दृष्टीने प्रयत्न करू शकता.

निदान लग्न ठरविताना आपला जोडीदार कुठल्या जातीचा असावा याचा काडीमात्र विचार न करता त्याचे गुणावगुण, आवडीनिवडी, स्वभाव यांना प्राधान्य देऊ शकता.

लग्न ठरविताना पत्रिका पहाण्याला फाटा देउन वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अंगीकार करू शकता. सामाजिक एकोपा वाढवू शकता.

आपण सुजाण नागरिक असाल तर …

आपल्या नात्यातील किंवा संबधित मुलगा किंवा मुलगी जर जातीबाहेर विवाह करीत असेल तर, अशा विवाहाला प्रोत्साहन देऊ शकता.

शक्य ती मदत करू शकता. निदान अशा विवाहाच्या आड न येण्याची खबरदारी घेउ शकता.

आपल्याला हे सहज शक्य आहे, त्यासाठी सर्वप्रथम आपले जातीचे लेबल आपण फेकून देउ शकता. सामोजिक एकोपा वाढवू शकता.

प्रसिद्धीसाठी कृपया खालील कळ दाबा
  • Facebook
  • Twitter
  • Google Bookmarks
  • Yahoo! Bookmarks
  • IndianPad
  • del.icio.us
  • Digg
  • MySpace
  • Technorati
  • LinkedIn
  • email
  • Print
  • PDF
Powered by WordPress | Managed by Unmesh Bagwe | Bestincellphones.com is a Better Way to Shop. | Thanks to MMORPG, Fat burning furnace and Homes for Sale
Powered By Indic IME